TIME IS MONEY

Sunday 18 March 2018

GUDHIPADVYACHA HARDIK SUBHECHHA

आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा नाद, एका तालात नाचवल्या जाणाऱ्या ध्वजांची आरास, त्याला सामाजिक संदेशांची किनार, समृद्धी व विजय यांचे प्रतीक असणाऱ्या गुढीची उभारणी, पारंपरिक पोशाखात नटलेली मंडळी आणि उल्हास आणि उर्जेने भारावून गेलेला माहोल... गुढीपाडवा म्हटले की हे सगळे ओघाने आलेच. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

रांगोळ्यांची कलाकुसर, मोटारसायकलींवर स्वार झालेल्या महिला व पुरुष, विविध ढोलपथकांची गर्जना, ध्वजपथकांची आकर्षक सादरीकरणे, तलवारबाजी, दांडपट्टा यांसारख्या गोष्टींची प्रात्यक्षिके, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ आणि चलचित्र, सामाजिक संदेशांची देवाणघेवाण आणि पारंपरिकतेचा मोहोर असे काहीसे या शोभायात्रांचे स्वरूप असते. हजारोंच्या संख्येने तरुण-वयस्कर मंडळी यात उत्साहाने सहभागी होतात. गिरगाव येथे सकाळी ७.३० वाजता नववर्ष दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर सकाळी ८ वाजता स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे नववर्ष स्वागतयात्रा आणि चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिसर येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सीएसएमटी येथे स. १० वाजता आशीष शेलार, संजय कुमार जैन, नरेंद्र पवार, के. जयशंकर, युवराज पाटील, प्रकाश कनोजिया यांच्या उपस्थितीत नववर्ष स्वागत सोहळा आणि सन्मान पुरस्कार २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. 

गुढीपाडवा अधिक सामाजिक
Recommended By Colombia


न्यू इयर सेलिब्रेशनच्या नादात हरवत चाललेले मराठी नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रा, शोभायात्रांनी पुन्हा मुंबईमध्ये रुजवले. मुंबईच्या या स्वागतयात्रांच्या उत्साहालाही दीड दशकाहून अधिक कालावधी झाला आहे. स्थानिक मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी मित्रमंडळींना भेटायला जमणारी गर्दी शोभायात्रा, स्वागतयात्रांमध्ये सहभागी होऊ लागली. या यात्रांमध्ये परंपरा तर जपली जात आहेच, मात्र त्याही पलीकडे या यात्रा अधिक समाजाभिमुख होत आहेत. पर्यावरण, प्रदूषण, मुलींचा जन्म अशा विविध विषयांवर भाष्य करत गेल्या दीड-दोन दशकांमध्ये मुंबईतील यात्रा पुढे सरकत आहेत. यंदाही मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या यात्रांमध्ये सामाजिक संदेश, महिला सक्षमीकरणाची गरज यावर भाष्य करण्यात येत आहे. त्याचसोबत जिम्नॅस्टिक, मल्लखांब या माध्यमातून व्यायाम आणि फिटनेस याबद्दलही जनजागृतीचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्वागतयात्रा उत्साहाचे प्रतीक तर असतातच शिवाय पारंपरिक फॅशन स्टेटमेंटही देण्याचा प्रयत्न करतात. 

गिरगावातील स्वागतयात्रेचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. मराठी नववर्षाचे आगमन लोकांना जाणवावे यासाठी ही स्वागतयात्रा सुरू झाली. या स्वागतयात्रांमध्ये विविध थीमवर आधारित चित्ररथ सहभागी होऊ लागले. यंदाची थीम ही महाराष्ट्रातील पर्यटनावर आधारित आहे. महाराष्ट्रात पर्यटनस्थळे असूनसुद्धा पर्यटनाला महत्त्व नाही म्हणून भ्रमंती महाराष्ट्राची या विषयाला अनुषंगून विविध संस्था यामध्ये आपापल्या चित्ररथांसह सहभागी झाल्या आहेत. याशिवाय प्रदूषणमुक्त मुंबई, स्त्री शक्ती असे सामाजिक विषयही यात मांडण्यात आले आहेत. गिरगावमधील स्वागतयात्रेमध्ये जमा होणारा कचरा या यात्रेच्या शेवटी असलेले संत गाडगेबाबा स्वच्छता पथक उचलते. त्यांच्या या कृतीतून महत्त्वाची जाणीव लोकांपर्यंत पोहोचते, अशी माहिती स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पराग वेदक यांनी दिली. स्वागतयात्रेमध्ये काही स्वयंसेवक सहभागी होणार असून आजूबाजूला दिसणारा प्लास्टिकचा कचरा त्यांच्याकडे लोकांनी सोपवला तर ते हा कचरा रिसायकल करणार आहेत. त्यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरही फिरत आहे. पारंपरिक वेशभूषा, आप्त मंडळींशी होणाऱ्या भेटीगाठी यासोबतच समाज म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीवही स्वागतयात्रांच्या माध्यमातून पेरली जात आहे. 

दहिसर, बोरिवलीमधील शोभायात्रांमध्ये नद्यांसंदर्भात माहिती दिली जात आहे. नद्यांना वाचवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसारखे महत्त्वाचे व्यासपीठ मिळणार नाही, असे सांगत रिव्हरमार्चर उत्साहाने यात सहभागी होत आहेत. जोगेश्वरीमध्ये संत परंपरेवर आधारित गुढीपाडव्याची शोभायात्रा काढण्यात येत आहे. दादर-नायगावमध्ये मासिक पाळीसंदर्भात स्वच्छता, लैंगिक समानता, इतर महिलाविषयक समस्या या विषयांवर शोभायात्रेत जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शोभायात्रांमध्ये कोणताही विषय वर्ज्य नाही उलट या माध्यमातून अनेक विषयांवर आवर्जून भाष्य करता येते, हेच गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट झाले आहे. इथे जुन्या परंपरा सांभाळण्यासोबत नव्या परंपरांचाही जन्म होत आहे. 

कापडी पिशव्या, निसर्गपूजा 

राज्य सरकारने आजपासून प्लास्टिक बंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर वरळीतील जांबोरी मैदानात शिवसह्याद्री फाऊंडेशनतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तर मराठी चळवळतर्फे गुढीपाडव्यानिमित्त निसर्गपूजा करण्यात येणार असून 'वेध पृथ्वीच्या बदलत्या पर्यावरणाचा' या विषयावर गिरीश राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 


No comments:

Post a Comment